गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी

गुरू नानकांची अयोध्येनंतर महाराष्ट्रवारी!

श्रीरामाशी निगडीत नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक स्थळांना दिली होती भेट

ramesh.padwal@timesgroup.com
@rameshpadwalMT / 8380098107

नाशिक : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी १५११ मध्ये रामजन्मभूमीला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, पंढरपूर, रत्नागिरी, मुंबर्इ या ठिकाणांना १५१३ मध्ये भेटी दिल्या होत्या. आज गुरूनानक जयंतीनिमित्त व नुकत्याच लागलेला आयोध्या निकालामुळे हा ऐतिहासिक संदर्भ नाशिकसाठीही महत्त्वपूर्ण ठरतो आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आयोध्येतील राम जन्मभूमी वादावर निकाल देताना अनेक पुराण कथांबरोबर शीख ग्रंथांचा आधारही दिला आहे. गुरू नानक यांच्या जन्मसाखी (गुरू नानक चरित्र) ग्रंथानुसार त्यांनी १५११ मध्ये राम जन्मभूमीची यात्रा करीत मंदिरात रामाचे दर्शन घेतले होते. त्यावरून मुघल सम्राट बाबर याने १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधली त्यापूर्वी आयोध्येत राम मंदिर अस्तित्वात होते हे सिद्ध झाले. जन्मसाखी बरोबरच वाल्मिकि रामायण आणि स्कंद पुराणाचाही आधार निकालासाठी घेण्यात आला आहे. हा संदर्भ अयोध्येपुरता जरी असला तरी गुरू नानकांची ही यात्रा अयोध्येपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी महाराष्ट्रातील श्रीरामाशी निगडीत प्रदेशांनाही भेटी दिल्या होत्या.  

नानकपंथीयांचा वावर महाराष्ट्रात अगदी नानकांच्या काळापासून चालू आहे. पंजाब विद्यापीठातर्फे प्रकाशिक करण्यात आलेल्या व सुरिंदर सिंह कोहली यांनी १९६९ मध्ये लिहिलेल्या ‘ट्रॅव्हल ऑफ गुरू नानक’ या पुस्तकात गुरू नानक यांनी साधारण १५१३ मध्ये आपल्या यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील नागपूरजवळील रामटेक येथे चार महिने वास्तव्य केले. नंतर ते अमरावती, अकोला, मलिकपूर, बुलडाणा, नांदेडहून हिंगोलीतील संत नामदेवांच्या औंध गावी गेले. पंढरपूर, रत्नागिरी, पुण्यातील रामटेकडी भेट दिली होती. मुंबर्इतील भेटीत त्यांनी हाजी अली दर्ग्यालाही भेट दिली. तेथून ते गोदावरी काठच्या नाशिकला आले. गोदावरीच्या डाव्या अंगाला वसलेल्या पंचवटीचा त्यांनी सहवास अनुभवून ते गुजरातमार्गे पुन्हा परतले होते.

      

गुरू नानकांचा पुत्र श्रीचंद्राचार्यची भेट

ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या १९७७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मानसयात्रा’ या पुस्तकात गुरू नानकांचे पुत्र आणि उदासी संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचंद्राचार्य यांनी महाराष्ट्रात केलेल्या सफरीचा उल्लेख आला आहे. तो असा,‘श्रीचंद्राचार्य हे परकीय आक्रमकांच्या विध्वंसक वृत्तीने अस्वस्थ झाले होते. राजस्थानातील रजपूत वीरांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भारताच्या विपरीत परिस्थितीचे त्यांनी डोळसपणाने निरीक्षण केले होते. हिमालयापासून रामेश्वरपर्यंत, एवढेच नव्हे तर वायव्येकडे काबूलपर्यंत त्यांनी भ्रमण केले. परंतु त्यांनी पुन्हा एकदा दक्षिणेकडे यात्रा करण्याचा संकल्प केला. आपला एक शिष्य कमालिया याला बरोबर घेऊन ते दिल्ली, ग्वाल्हेर, जबलपूर, नागपूर, रामटेक या मार्गाने रामेश्वपर्यंत गेले. तेथून परतताना शके १५४६ (१६२४) मध्ये ते नाशकास आले.’

श्रीचंद्राचार्याची आणि समर्थांची भेट

श्रीचंद्राचार्य नाशिकमध्ये आले तेव्हा गोदावरी-नंदिनी संगमावर एक तेजस्वी बालयोगी रामदास (समर्थ रामदास) निग्रहाने तपाचरण करीत असल्याचे त्यांना कळाले. तेव्हा त्यांनी बालयोगी समर्थांची भेट घेऊन आपल्या अंतरीचे शल्य दाखवून समर्थांना उपासनेचा संदेश दिला. श्रीचंद्राचार्याना भेटलेला हा बालयोगी म्हणजे पुढे महाराष्ट्र धर्माचे विजयशाली उत्थान घडविणारे समर्थ रामदास होत. ही ऐतिहासिक भेट गोदाकाठी नाशिकमध्ये झाल्याची दुर्मिळ नोंदही ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ‘मानसयात्रा’ या पुस्तकात केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!