काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन

काश्मिरी पंडित राजाचे नाशिक कनेक्शन!

सिंधचा चंद्रसेन उपासनेसाठी विसावला पांडवलेणीत

Ramesh.padwal@timesgroup.com
Tweet : @MTramesh
नाशिक : नाशिकचं वैभव असलेल्या त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी या बौद्ध लेणीचं आकर्षण जगभरातील अनेकांना राहिलं आहे. मग तो चिनी प्रवासी हू-एन-त्संग असो वा, सातव्या शतकातील सिंधचा राजा काश्मिरी पंडित चंद्रसेन. चंद्रसेन हा काश्मिरी पंडित असला तरी बौद्ध धर्माचा उपासक होता अन् उपासनेसाठी तो नाशिकच्या या लेणींमध्ये विसावला, असा उल्लेख ‘चचनामा’ या अरबी पुस्तकातून समोर आला आहे.

‘चचनामा’ या अरबीतील ग्रंथाचे फारशीमध्ये अनुवाद अरब प्रवासी अली बिन हामिद अबु बकर कोफी यांनी १२१६ मध्ये केला. या ग्रंथाला ‘फतेहनामा’ या नावानेही ओळखले जाते. त्यानंतर अनेकांनी यावर इंग्रजीत लेखन केले. सिंधियाना एनसायक्लोपिडीयानुसार, शेकडो वर्षांपूर्वी अनेक काश्मिरी पंडित काश्मीर सोडून सिंध प्रांतात विसावले. यांनी तेथे आपला राजकीय प्रभाव वाढविला आणि येथील १८४ वर्षे जुन्या राय घराण्याची सत्ता संपवली व सिंध प्रातांत प्रथमच काश्मिरी पंडित घराण्याचा उदय झाला. या घराण्याचे पहिले राजा चच. पश्चिमेकडील मकरान (बलुचिस्तानचे वाळवंट), दक्षिणकडील अरबी समुद्र, गुजरात, पूर्वेकडील माळवा, उत्तरेत मुल्तानकडून दक्षिणी पंजाबपर्यंत चच घराण्याची सत्ता होती. या राजांचा सिंधमधून जमिनी तसेच समुद्री मार्गे व्यापार चालायचा.

चच राजाला दोन मुले होती. यात मोठा चंद्रसेन व लहान दाहिर. चचनंतर चंद्रसेन सिंधचा सात वर्षे राजा होता. मात्र, तो बौद्ध अनुयायी होता. त्याने सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार केला. हे पाहून दाहिर याने गादी ताब्यात घेतली. या दरम्यान, चंद्रसेन बौद्ध उपासनेसाठी नाशिकला आल्याचा उल्लेख चचनाम्यात आला आहे. तसेच १८६७ मध्ये लंडन येथे प्रकाशित झालेले ‘History of india, as told by its own historians’ या पुस्तकात सर एच. एम. इलियट (East india company's Bengal Civil Service) या इंग्रज अधिकाऱ्याने चचनाम्याचे संदर्भ घेऊन लिहिलेल्या पुस्तकातही याचा उल्लेख आला आहे.

राजा दाहिरने यावेळी बौद्ध भिख्खूंवर अत्याचार केल्याचे काही इतिहासकार मांडतात. बगदादचे प्रमुख हुज्जाज बिन यूसुफ खलिफाने सिंधवर १५ वेळा आक्रमण केले; मात्र तो सिंध जिंकू शकला नाही. अखेर त्याने त्याचा भाचा मोहम्मद बिन कासिम याला इ. स. ७१० मध्ये सिंधवर हल्ला करायला पाठविले. यात त्याने राजा दाहिरवर कूटनीतीने विजय मिळविला. यावेळी बौद्ध भिख्खूंनी कासिमचे निरोनकोट आणि सिवस्तानमध्ये (पाकिस्तानातील शहरे) स्वागत केल्याचे चचनाम्यात म्हटले आहे. चचनामा चंद्रसेनाबाबत इतकीच माहिती देतो. मात्र, चंद्रसेनाने स्वत:ला बौद्ध धर्मासाठी वाहून घेतल्याने तो नाशिकमधील लेणींमध्ये धर्माच्या उपासनेत लीन झाल्याचा उल्लेख चचनाम्यात आहे. चंद्रसेनच नव्हे; तर त्याचा मोठा भाऊ दाहिरच्या सूर्या व परमल या दोन्ही मुलीही आपल्या काकाच्या पावलावर पाऊल ठेऊन बौद्ध धर्माची उपासना करण्यात दंग झाल्या होत्या, हेही समोर येते.
८३८००९८१०७
(पूर्वार्ध:)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकमध्येही हवं ‘मूर्तीचं वरकुटे’!

लकडी की काठी, काठी का घोडा!

काळाराम मंदिर सत्याग्रह : २ मार्च, काळाराम अन् रमेशायण!